Marathi Essay on Autobiography of India's Flag, Autobiography of Indian Flag Information in Marathi | राष्ट्रध्वजाचे मनोगत मराठी निबंध लेखन




Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on Autobiography of India's Flag | Autobiography of Tiranga | Rashtrdhwajache Manogat | Me Tiranga (Rashtrdhwaj) Boltoy. राष्ट्रध्वजाचे मनोगत मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


मी राष्ट्रध्वज बोलतोय…


कधी नव्हे, तर आज सूर्यदेव जरा लवकरच मावळतीला जात होते . सायंकाळचे ५ .३० वाजले होते. अचानक मनात विचार आला की , थोडा विरंगुळा म्हणून बाहेर फिरून यावे आणि मी चप्पल घालून थेट घराबाहेर पडलो. अवतीभोवतीचा सुंदर परिसर न्याहाळत मी रस्त्यांवरून हिंडत होतो . थोड्याच अंतरावर मला एक सुंदर बाग दिसली. मी त्या बागेत गेलो आणि तिथे असलेल्या एका बाकावर विराजमान झालो. बागेतील सुंदर रंगबेरंगी फुले आणि खेळणारी गोंडस मुले यांमुळे मन अधिकच प्रसन्न झाले होते.

सभोवतालचे दृश्य बघता बघता अचानक माझे लक्ष चौकाच्या मध्यभागी उभारलेल्या राष्ट्रध्वजाकडे गेले. खरंतर , राष्ट्रध्वज आपल्या सगळ्यांच्या पूर्ण परिचयाचा आहे , परंतु वाऱ्याबरोबर फडकणारा आपला राष्ट्रध्वज आज आगळावेगळा भासत असल्याचे जाणवत होते. जणू तो माझे मन आकर्षित करत आहे असं वाटत होते. निळया आकाशाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारत देशाचा तिरंगा फडकत होता. मी खूप आदराने त्याच्याकडे एकटक पाहत होतो तेवढ्यात मला जाणवले की , आपला राष्ट्रध्वज माझ्याशी काहीतरी बोलत आहे .

जणू तो मला काही सांगत होता. "माझ्या प्रिय भारत रहिवाशीयांना त्यांच्या लाडक्या राष्ट्रध्वजाचा नमस्कार !" तिरंग्याचे हे प्रेमळ शब्द ऐकताच माझ्या गालावर स्मितहास्य आले . आणि तो पुढे बोलू लागला की , मी तुझ्या राष्ट्राचे प्रतीक आहे. मी म्हणजेच भारत आहे. मला दिलेला सन्मान हा आपल्या भारत देशाचा सन्मान आहे. माझ्यामागे माझा उज्ज्वल इतिहास आहे. माझे आजचे हे रूप, आजचे हे स्थान मिळविण्यासाठी मला फार मोठ्या आपत्तीतून जावे लागले. माझे संरक्षण करण्यासाठी माझ्या सुपुत्रांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे रक्त या भारतमातेला अर्पण केले. माझ्या शूर सुपूत्रांची साथ मला सदैव लाभली.

मी आजतागायत भारतीयांना त्यांच्या सुख दुःखात नेहमीच साथ दिली आहे. सर्वप्रथम १८५७ मध्ये माझा रंग हिरवा होता आणि चारी बाजूंना बारीक सोनेरी पट्टी होती.त्यानंतर मी माझ्या अंगावरील सोनेरी पट्टीचा रंग केशरी केला. माझ्या रूपात वेळोवेळी बदल होत गेले. हिरव्या व केशरी रंगांमध्ये पांढरी पट्टी आली. कधी माझ्यावर 'वंदे मातरम्' ही अक्षरे आली तर कधी सूर्य, चंद्र; कधी कमळे. १९२० नंतर मी तिरंगा बनलो व स्वदेशप्रेमाचे प्रतीक असा चरखा माझ्यावर आला.

पुढे २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) म्हणून मला अंगीकारले. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला होता. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. स्वातंत्र्योत्तर काळात मी 'राष्ट्रध्वज' बनलो तेव्हा माझ्या अंगावर अशोकाचे हे निळे चक्र आले. अखेर घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली आणि मला आणखी एक नवीन स्वरूप मिळाले.

माझी रचना खादीच्या अथवा रेशमच्या कापडाने केली गेली. माझ्या उंचीचे व लांबीचे प्रमाण २:३ असे आहे, ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. तसेच चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर मला फडकवून अखिल विश्वाला आपला भारत स्वतंत्र झाल्याची ग्वाही मिळाली. आजवर माझ्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. स्वातंत्र्यलढयात हातावर लाठ्या बसल्या, बंदूकीच्या गोळ्या बसल्या तरी त्यांनी मला कधी खाली पडू दिले नाही. ते सारे रोमांचकारक क्षण आजही डोळ्यांसमोर जसेच्या तसे दिसत आहेत आणि माझे अंतःकरण दुःखाने जड होत आहे.

आज खूप दिवसांनी कोणीतरी एवढया अभिमानाने माझ्याकडे पाहताना बघून मला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. नाहीतर आजचा यूवक स्वतःतच एवढा गुरफटलेला असतो की त्याचे माझ्याकडे लक्षही जात नाही. स्वातंत्र्यदिनानंतर मी स्वतःला कधी रस्त्यावर तर कधी धुळीत माखलेले आढळतो. तेव्हा मला असंख्य यातना होतात. पण लक्षात ठेवा; माझा सन्मान म्हणजे तुमच्या राष्ट्राचा सन्मान म्हणजे पर्यायाने तुमचा स्वतःचा सन्मान आहे. पाहता पाहता आवाज बंद झाला; मी मात्र माझा ध्वज डौलाने फडकत असलेला पाहून सुखावत होतो. घरी परत येताना मनात निश्चय केला , आजपासून माझ्या तिरंग्याचे मी सैदव रक्षण करेन.







Written by Priyanka Kumbhar

2 comments

Amol said...

Khup chhan nibandh Tayar kelas...great

QualityQuotes said...

Thank you!