Best 15 August Independence Day Speech in Marathi | १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमीत्त मराठी भाषण




Marathi speech writing topics for school students, speech topics for class 10. I hope you’ll like this articles related to 15 August Independence Day Speech in Marathi. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमीत्त मराठी भाषण लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


स्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण


नमस्कार ! माझे आदरणीय मुख्यध्यापक , सर्व अध्यापक व अध्यापिका, सर्व पालकवर्ग आणि माझे प्रिय विदयार्थी बंधू भगिनींनो माझ्याकडून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मला आपल्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे .

१५ ऑगस्ट हा आपल्यासाठी खूप अनमोल दिन आहे. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. आपल्या पूर्वजांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वतंत्र मिळवून दिले. देशाच्या कित्येक सुपुत्रांनी प्राणाचे बलिदान दिले . तो एक असा सुवर्ण क्षण होता की , केवळ त्यामुळेच आज आपण भारतात आनंदाने श्वास घेत आहोत. आपण हे कधीच विसरू शकत नाही की, आजच्या दिवशी आपला देश अन्यायकारी ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होवून एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला .

आजचा दिवस हा त्या सर्व शहीदांना स्मरण करण्याचा आहे, आपण त्यांच्या कर्जाची परतफेड कधीच करू शकणार नाही परंतु त्यांनी दिलेले हे स्वातंत्र्य आपण कायम जपणे हे महत्वाचे आहे. आज आपण स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या आपल्या भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष, बंडखोरी आणि प्रयत्न लक्षात ठेवून त्या वीरजवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया .

आपला भारत हा मातृभूमी मानला जातो. देशातील रहिवाशी ही या भारतमातेची मुलं आहेत. आपल्या आईसाठी कर्तव्य बजावणारे शहीद हीच भारतमातेची खरी सुपुत्र आहेत. जे महान पुरुष जे कर्तव्यासमोर आपल्या जीवालासुद्धा तुच्छ मानतात अशा हुतात्म्यांचा महिमा गायला शब्दच अपुरे पडतील .

भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजे ब्रिटिश सरकारच्या राजवटीपासून केवळ भारताचे स्वातंत्र्यच नव्हे तर या देशाची शक्तीदेखील दर्शवितो. आणि जेव्हा हा दिवस या देशातील सर्व लोकांना एकत्र करतो तेव्हा भारताचे खरे वैभव दिसून येते.

आज आपला भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. एक सुजज्ज भारत घडविण्याचा प्रयत्न करत आहे. आपण देशाचे नागरिक म्हणून देशासाठी कार्य करू शकतो. केवळ जीवन देऊन देशभक्तीची भावना दर्शविली पाहिजे हे गरजेचे नाही तर आपली कर्तव्ये, हक्क याविषयी आपण जागरूक राहिले पाहिजे. हीच त्या शहीद, देशभक्त आणि मातृभूमीला आपली खरी श्रद्धांजली असेल.

देशाची भक्ती एखाद्याच्या जीवाचे बलिदान देऊन केली जात नाही. प्रत्येक दृष्टीने देशाशी एकनिष्ठ राहणे देखील देशभक्ती आहे. देशाच्या वारशाचे रक्षण करणे, देश स्वच्छ करणे, कायद्याचे पालन करणे, भ्रष्टाचाराला विरोध करणे, परस्पर प्रेमाने जगणे इत्यादी सर्व कामे देशभक्तीच्या अंतर्गत आहेत.देशाशी एकनिष्ठ राहणे ही खरोखरच देशाची सेवा आहे. हे देशाला आतून बळकट करते. देशात एकता वाढते आणि ऐक्य हेच देशाचे सामर्थ्य आहे.

भारताच्या स्वातंत्र्याचे मूल्य कोणीही सांगू शकत नाही. इंग्रजांनी संपूर्ण २०० वर्षे भारतावर राज्य केले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी अखेर त्यांनी भारत सोडले. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी गमावलं पाहिजे, त्याच प्रकारे त्या शूर जवानांनी आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करून मोलाचे योगदान दिले. त्यांचा त्याग आपण कधीच विसरू नये.

आज आपण स्वातंत्र्यदिनी आपल्या देशातील सर्व जवानांचे कर्तृत्व आठवतो म्हणून आपण आपल्या सैनिकांना कधीच विसरू नये. आपण शूर सैनिकांचे आभारी आहोत की त्यांच्यामुळे आपण आपल्या देशात शांततेने जगू शकतो कारण आपल्याला माहित आहे की, ते आपले रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. ते भारताला धोका असलेल्या दहशतवादी सैन्यापासून आपले संरक्षण करतात.

आपल्या सैनिकांद्वारे प्रेरित होऊन आपल्या देशाला अधिक चांगले स्थान मिळवून देण्याचे एकत्रपणे काम करूया. या स्वातंत्र्यदिनी आपण आपला देश महान बनविण्यासाठी एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य एकनिष्ठतेने पाळण्याचे वचन देऊया .

आपल्याला आपला भारत इतका सशक्त करायचा आहे की, कोणीही आपल्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा विचार करणे तर दूरच पण आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मतदेखील करणार नाही . ज्या वीरजवानांनी आपल्या भारतसाठी आपले बलिदान दिले आहे, आपण त्यांना नमन करून शपथ घेऊया की, आपल्याला भारतासाठी जर मरण पत्करावे लागले तरी आपण मागे हटणार नाही.

माझे भाषण काळजीपूर्वक ऐकल्याबद्दल मला पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानायचे आहे. आणि मलाही तुम्हाला बोलण्याची संधी द्यायची आहे. जय हिंद ! भारतमाता की जय !!!







Written by Priyanka Kumbhar

No comments